Total Pageviews

Thursday, September 17, 2020

घुसमट

 कधी कधी घुसमट वाढत जाते. बोलायला कोणीच रहात नाही. अगदी जवळची माणसं सुद्धा परकी होतात.खरं तर ती परकी नसतात पण बांधलेली असतात समाजाच्या नियमात. एकेकाळी सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगतो पण वेळेनुसार नाती पण बदलतात. मनातल्या मनात झुरणं वाढत जातं. कधी कधी तर जगावं की मरावं हा सुद्धा प्रश्न पडतो.

जीवन संपवण्याचा विचार केला तर असं वाटतं कोणासाठी संपवावं आयुष्य. अशा लोकांसाठी ज्यांना आपल्या असल्या नसल्याची पर्वा नाही पण त्याचं आपल्या आयुष्यात असणं समाजाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. शेवटी त्रास आपल्या माणसांना जी आता परकी झालीत. ज्यांनी नेहमीच माझ्या सुखाची अपेक्षा केली तेच सांगत आहे आज सगळं सहन करायला सामाजाचा एक भाग बनून.पण खरंच माझं आयुष्य इतकं स्वस्त आहे का की काही लोकांच्या खुष असण्यासाठी मी ते निमूटपणे नशीबाच्या स्वाधीन करावं.

लहानपणी एक गोष्ट नेहमी एेकली होती,नशीब हे ठरलेलं नसतं , ते आपल्या हातात असतं. आपण पाहीजे तसं त्याला बनवू शकतो. मग खरंच मी माझ्या सुखासाठी एक निर्णय घेऊ शकते का???

माझं आयुष्य हे संपवण्याइतकं नक्कीच स्वस्त नाही. ते मी भरभरून जगू शकते.

खरं तर आपल्या माणसांच्या सुखासाठी आहे त्या परिस्थितीत जगूही शकतो पण एक टोचणी कायम मनात राहील ती म्हणजे आयुष्य न संपवताही ते कायमचं हातातून निसटल्याची. 

असं म्हणतात खूप पुण्य केल्यानंतर माणसाला मनुष्य जन्म मिळतो.या जन्माचं सार्थक कसं करायचं ते आपल्या हातात असतं ,पण सार्थक म्हणजे नेमकं काय? जन्माला येणं ? देवाने पेट दिलंय म्हणून 3 वेळा खाणं? आयुष्यातला प्रत्येक टप्पा एखाद्या जनावराप्रमाणे स्वत:चा लाभ बघत भेकडासारखं जगणे? आणि एक दिवस उसना श्वास न मिळाल्याने मरून जाणे.?

माणूस हा नेहमी समाज घडवतो . समाज कधीच माणसाला घडवत नाही.

माणूस आहे म्हणून समाज आहे. पण हा समाजच माणसाला सुखाने जगू देत नाही.

एखाद्या माणसाला त्याचं आयुष्य कशा पद्धतीने जगायचंय याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जो देतो तो खरा समाज.असा समाज कधीच माणसाला पुढे जाऊ देत नाही आणि माणूस पुढे गेला नाही की समाजही मागेच रहाते.

समाजाला आवडतं नेहमीच एका वर्तुळात रहायला .

तो कधीच त्याचा व्यास रुंदावत नाही.

परिघ पेटला तरी त्यात जळून मरणार्याला जन्माचं सार्थक मानणारा समाज कोणीतरी उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्याला निखारे मारून संपवतो पण संपवतोच...

कही जण त्या निखार्यालाही पुरून उरतात , ती वाचतात आणि बनतात आदर्श त्या समाजासाठी पण वर्तुळाच्या बाहेर नावापुरती...

माझा एकच प्रश्न आहे माझ्या त्या जवळच्या लोकांना  ,जर माझ्या सुखात तुमचं सुख आहे.तर मला एक संधी द्याल का समाजाची लक्ष्मण रेखा ओलांडण्याची आणि परिघाच्या बाहेरचा आदर्श बनण्याची???





No comments:

Post a Comment

प्रेमासाठी आसुसलेलं मन

प्रेमासाठी आसुसलेलं मन एका निरव वाटेवर डोळे लावून बसलं त्याच वाटेवर मात्र त्याला धुक्याने घेरलं  त्या दाट धुक्याच्या मागे प्रेम असेल  म्हणून...