आत्म्याचा शरिराशी संवाद
#वेळ निघून जाते...ती कधीच वेळ देत नाही विचार करायला...म्हणून आयुष्याची किंमत आपणच करायची असते...कारण एकदा निसटलेलं आयुष्य फक्त सोडून जातं मागे वळून न पहाता...😇😇
--------------------------------------------------------------------------------------------------
तू गेलास
तू सुटलास
तुझ्या यातनेतून
तुझ्या न संपणार्या विचारांच्या कलहातून
तुझ्या अपूर्ण , अशक्त, केविलवाण्या स्वप्नांतून
अशक्त आणि केविलवाणीच ती
मला दुसरा शब्द सुचत नाही
कारण तुझं असणं त्यांच्या पूर्ण होण्याचं कारण होतं
पण त्या कारणाला तू संपवलंस स्वत:च स्वत:चा गळा घोटून...
तुला वाटलं तुझ्या सोबत आता कोणीच नाही
कोणाचा मायेचा हात नाही
कोणाची घट्ट मिठी नाही
ना कोणाचे आधार देणारे शब्द...
पण असं फक्त तुला वाटलं
कारण ते सगळे नेहमीच होते तुझ्या जवळ
पण तुला तुझी निराशा इतकी स्पष्ट दिसत होती की
त्यामागे तुला मिठी मारण्याकरता पसरलेले हात तुझ्या नजरेत कधी अंधूक झाले ते तुलाच कळलं नाही..
तू कधीच माझं ऐकलं नाहीस
तुझ्या जवळ असताना
पण आज तुला ऐकावं लागेल माझं
कारण मी वेगळा झालोय तुझ्या शरीरातून कायमचा
आणि बघतोय असं द्दृष्य जे तू जिवंतपणी पाहिलं असतंस
तर हे जीवन संपवण्याचा विचार कधीच केला नसतास...
मी पहातोय तुझ्याच जवळच्या माणसांना तुझ्यासाठी रडताना
कधी खरचटलं तरी मलम लावणार्या तुझ्या आईवडिलांना तुझ्याच शरीराला अग्नि देताना
राख होईल तुझ्या शरिराची आज पण राखरांगोळी मात्र त्यांच्या आयुष्याची होईल,
तू सुटलास कायमचा तुझ्या त्रासातून पण त्रासाचं कारण शोधण्यात आता त्यांचं पूर्ण आयुष्य जाईल.....
माझे शब्द ऐकून तुला दु:ख वाटेल खूप
आणि तू बोलावशील मला पुन्हा तुझ्या शरिरात रहायला
पण मित्रा वेळ निघून गेलीय आता पश्चात्ताप करायला......
-कोमल कोरडे
No comments:
Post a Comment