Total Pageviews

Thursday, January 14, 2021

प्रेमासाठी आसुसलेलं मन


प्रेमासाठी आसुसलेलं मन
एका निरव वाटेवर डोळे लावून बसलं
त्याच वाटेवर मात्र त्याला धुक्याने घेरलं 
त्या दाट धुक्याच्या मागे प्रेम असेल 
म्हणून मन माझं धावलं 
जरा पूढे गेले ,
धुकं नाहीसं झालं 
अन् प्रेमही मिळालं 
ग्रृहित धरून त्याला दिवसरात्र जपलं
पण एका दिवसाचं आयुष्य त्याचं
क्षणार्धात संपलं
घट्ट त्याला धरून रात्री मिठीमध्ये घेतलं
रात्र ओसरता पुन्हा एकदा
धुक्यातच ते विरलं..... 
                  -कोमल


Friday, September 18, 2020

नातं स्वत:चं स्वत:शी

 जेव्हा जगात सगळीच नाती साथ द्यायची सोडतात
तेव्हा खरी वेळ असते स्वत:ने स्वत:ची साथ देण्याची
कोणाच्या सुखासाठी नाही 
तर स्वत:च्या आत्म सन्मानासाठी
कारण तो आहे तर हे जीवन जगण्यात मजा आहे
कोणतंच नातं जगात इतकं अतूट नाही
जितकं स्वत:चं स्वत:शी असतं
एकदा स्वत:ला ओळखलं की सगळी नाती हरून देखील 
एक नातं कायमचं घट्ट होतं....
                            -कोमल


Thursday, September 17, 2020

समाज

 समाजाला आवडतं नेहमीच एका वर्तुळात रहायला .
तो कधीच त्याचा व्यास रुंदावत नाही.
परिघ पेटला तरी त्यात जळून मरणार्याला जन्माचं सार्थक मानणारा समाज कोणीतरी उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्याला निखारे मारून संपवतो पण संपवतोच...
कही जण त्या निखार्यालाही पुरून उरतात , ती वाचतात आणि बनतात आदर्श त्या समाजासाठी पण वर्तुळाच्या बाहेर नावापुरती...



घुसमट

 कधी कधी घुसमट वाढत जाते. बोलायला कोणीच रहात नाही. अगदी जवळची माणसं सुद्धा परकी होतात.खरं तर ती परकी नसतात पण बांधलेली असतात समाजाच्या नियमात. एकेकाळी सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगतो पण वेळेनुसार नाती पण बदलतात. मनातल्या मनात झुरणं वाढत जातं. कधी कधी तर जगावं की मरावं हा सुद्धा प्रश्न पडतो.

जीवन संपवण्याचा विचार केला तर असं वाटतं कोणासाठी संपवावं आयुष्य. अशा लोकांसाठी ज्यांना आपल्या असल्या नसल्याची पर्वा नाही पण त्याचं आपल्या आयुष्यात असणं समाजाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. शेवटी त्रास आपल्या माणसांना जी आता परकी झालीत. ज्यांनी नेहमीच माझ्या सुखाची अपेक्षा केली तेच सांगत आहे आज सगळं सहन करायला सामाजाचा एक भाग बनून.पण खरंच माझं आयुष्य इतकं स्वस्त आहे का की काही लोकांच्या खुष असण्यासाठी मी ते निमूटपणे नशीबाच्या स्वाधीन करावं.

लहानपणी एक गोष्ट नेहमी एेकली होती,नशीब हे ठरलेलं नसतं , ते आपल्या हातात असतं. आपण पाहीजे तसं त्याला बनवू शकतो. मग खरंच मी माझ्या सुखासाठी एक निर्णय घेऊ शकते का???

माझं आयुष्य हे संपवण्याइतकं नक्कीच स्वस्त नाही. ते मी भरभरून जगू शकते.

खरं तर आपल्या माणसांच्या सुखासाठी आहे त्या परिस्थितीत जगूही शकतो पण एक टोचणी कायम मनात राहील ती म्हणजे आयुष्य न संपवताही ते कायमचं हातातून निसटल्याची. 

असं म्हणतात खूप पुण्य केल्यानंतर माणसाला मनुष्य जन्म मिळतो.या जन्माचं सार्थक कसं करायचं ते आपल्या हातात असतं ,पण सार्थक म्हणजे नेमकं काय? जन्माला येणं ? देवाने पेट दिलंय म्हणून 3 वेळा खाणं? आयुष्यातला प्रत्येक टप्पा एखाद्या जनावराप्रमाणे स्वत:चा लाभ बघत भेकडासारखं जगणे? आणि एक दिवस उसना श्वास न मिळाल्याने मरून जाणे.?

माणूस हा नेहमी समाज घडवतो . समाज कधीच माणसाला घडवत नाही.

माणूस आहे म्हणून समाज आहे. पण हा समाजच माणसाला सुखाने जगू देत नाही.

एखाद्या माणसाला त्याचं आयुष्य कशा पद्धतीने जगायचंय याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जो देतो तो खरा समाज.असा समाज कधीच माणसाला पुढे जाऊ देत नाही आणि माणूस पुढे गेला नाही की समाजही मागेच रहाते.

समाजाला आवडतं नेहमीच एका वर्तुळात रहायला .

तो कधीच त्याचा व्यास रुंदावत नाही.

परिघ पेटला तरी त्यात जळून मरणार्याला जन्माचं सार्थक मानणारा समाज कोणीतरी उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्याला निखारे मारून संपवतो पण संपवतोच...

कही जण त्या निखार्यालाही पुरून उरतात , ती वाचतात आणि बनतात आदर्श त्या समाजासाठी पण वर्तुळाच्या बाहेर नावापुरती...

माझा एकच प्रश्न आहे माझ्या त्या जवळच्या लोकांना  ,जर माझ्या सुखात तुमचं सुख आहे.तर मला एक संधी द्याल का समाजाची लक्ष्मण रेखा ओलांडण्याची आणि परिघाच्या बाहेरचा आदर्श बनण्याची???





Tuesday, September 8, 2020

अनोळखी वाट

 कधीतरी फक्त चालत रहावं 
एकट्याने ....
एका अनोळखी रस्त्यावर .
पण नेहमीच मनाला भावणार्या
सुनसान वाटेवर...
नसावा कोणाचाच हात हातात
मग नाही रहाणार तो हात निसटण्याची भीती
किंवा तो हात सोडण्याची टोचणी मनाला
फक्त चालत रहावं ती वाट जिकडे जाईल तिकडे
अखेर मनाला शांती देणार्या त्या कल्पवृक्षाच्या छायेकडे
कायमची विश्रांती घ्यायला.....
                              - कोमल


Monday, August 24, 2020

पुनर्जन्म

 जेव्हा आपण स्वत:चा विचार न करता 

इतरांचा विचार करतो 

तेव्हा आपला पुनर्जन्म होतो...

जेव्हा आपल्या डोळ्यातले अश्रु आपण 

समोरच्याच्या हसण्यासाठी पुसतो

तेव्हा आपला पुनर्जन्म होतो

जेव्हा खोट्याला नाकारून आपण 

खरं स्विकारतो

तेव्हा आपला पुनर्जन्म होतो

जेव्हा स्वत:साठी आधार न शोधता 

आपण दुसर्यांचा आधार होतो

तेव्हा आपला पुनर्जन्म होतो

आयुष्य संपवून कधीच प्रश्न सुटत नाही

जेव्हा जुनाट विचारांना आपण संपवतो

तेव्हा खरा पुनर्जन्म होतो....

                             -कोमल


जन्म एका कळीचा

 फुल बनन्याचं स्वप्न होतं 
पण कळी कधी उमललीच नाही
बंद पाकळ्या विस्कटून गेल्या 
सुगंध कधी दरवळलाच नाही....
खत पाणी घालणारा कोणीतरी वेगळा होता 
माझी काळजी घेणारा होता
त्याच्यावर माझा विश्वास होता
अन् त्याचा माझ्यावर जीव होता...
मुलासारखं सांभाळलं मला
मायेनं नेहमी वाढवलं मला
रोपाला कळीने बहरवलं त्याने
पण जगाची रीत म्हणून
विकायला बाहेर काढलं त्याने...
येणारा जाणारा सौंदर्य पहात होता 
हळूच हात लावून गोंजारत होता
मलाही कौतुक केल्याचं छान वाटत होतं 
अन् thank you म्हणून सुगंधाचं अत्तर लावत होते
अचानक कोणीतरी पुन्हा जवळ आलं 
मायेनं हात फिरवत जवळ घेउ लागलं
वाटलं आज वेळ झाली आपली 
इथून बाहेर पडण्याची 
नवीन जागेवर पुन्हा नव्याने फुलण्याची
न विचारता  मला माझी किंमत केली गेली
अन् हसत हसत मी माझ्या जवळच्यांची रजा घेतली
दु:ख होतं मनात पण समाधानही होतं
बापासारखं काळजी घेईल कोणीतरी 
या आशेचं बीज मनात होतं....
घरी आले त्याच्या 
स्वागत छान झालं
म्हटलं सार्थक झालं जन्माचं 
दुसरं घर मिळालं....
ती रात्र छान गेली 
स्वप्न पहाण्यात रंगून
सकाळ झाली तर पहाते
विश्वास ठेवलेल्या हातांनी टाकले मला छाटून 
आता पडलेली आहे 
अशा एका ठिकाणी
जिथून फेकली जाईल कचर्यात 
अन् माझी जागा घेईल 
उमलण्याचं खोटं स्वप्न पहाणारी 
एक दुर्दैवी कळी दुसर्या क्षणात....
                                      -कोमल


Friday, July 10, 2020

स्वभाव 3 -गुरू द्रोणाचार्य

काही अशी  लोक आयुष्यात येतात...जी आपल्यावर खूप प्रभाव टाकतात..आपल्याला वाटायला लागतं ती गुरू बनून आपल्या आयुष्यात आली आहेत.ज्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल.खरंतर ती गुरूच असतात पण गुरू द्रोणाचार्यांसारखी. ज्यांना नेहमीच शिष्यापेक्षा प्रिय असतं स्वत:चं शिष्याचा गुरू असणं .ज्यांना नेहमी वाटत असतं, शिष्यावर अभिमान करता येवो अथवा न येवो पण शिष्याने आणि सर्वांनीच कायमच त्यांचा अभिमान करावा...असे गुरू मग अर्जुन श्रेष्ठ बनावा म्हणून एकलव्याकडून अंगठा मागायलाही मागे पुढे पहात नाही..यातून मग असा शिष्य जन्माला येतो जो सर्वश्रेष्ठ असतो पण एकट्याशीच लावलेल्या शर्यतीत...त्यामुळे शिष्य एकवेळ श्रेष्ठ नसला तरी चालतो पण गुरू स्पर्धा करणारा नसावा...
                                                      -कोमल

प्रेमासाठी आसुसलेलं मन

प्रेमासाठी आसुसलेलं मन एका निरव वाटेवर डोळे लावून बसलं त्याच वाटेवर मात्र त्याला धुक्याने घेरलं  त्या दाट धुक्याच्या मागे प्रेम असेल  म्हणून...